भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले   

पेरूगेटजवळील घटना

पुणे : सदाशिव पेठेतील पेरूगेट जवळ असलेल्या भावे हायस्कूलनजिक भरधाव प्रवासी मोटारीने बारा जणांना उडवल्याची घटना शनिवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली. या घटनेत जखमी झालेले बहुतांश स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. चार विद्यार्थ्यांना फ्रॅक्चर झाले असून त्यांना संचेती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, इतरांना शेजारी असलेल्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी मोटारचालकाला ताब्यात घेतले.
 
जयराम शिवाजी मुळे (वय-२७, बिबवेवाडी) असे मोटारचालकाचे नाव असून, त्याला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोटारमालक दिगंबर यादव शिंदे (वय-२७) आणि सहप्रवासी राहुल गोसावी (वय-२७) यांनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. मुळे हा दारू पिऊन मोटार चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. पोलिसांनी मुळे, शिंदे आणि गोसावी या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
जखमी झालेले सर्वजण सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास चहा पिण्यासाठी भावे हायस्कूलनजिकच्या टपरीजवळ थांबले होते. यावेळी परिसरातून मोटार घेऊन जात असताना मुळे याचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याने बारा जणांना धडक दिली. तसेच, परिसरात लावलेल्या मोटारींनादेखील त्याने उडवले. मोटारीने उडवलेल्या बारा जणांपैकी चौघांना संचेती हॉस्पिटलमध्ये तर, इतर आठ जणांना योगेश हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पोलिसांनी मोटारचालकाची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला ससून रुग्णालयात नेले आहे. 
 
जखमींमध्ये किशोर हरिभाऊ भापकर (वय-५७), पायल आवेश कुमार दुर्गे (वय-२६), गुलणाज सिराज अहमद (वय-२३), सोनाली सुधाकर घोळवे (वय-३०), मंगेश आत्माराम सुरूसे (वय-३३), अमित अशोक गांधी (वय- ४५), समीर श्रीपाद भालचिकर (वय-४५), सोमनाथ केशव मेरूकर (वय-२८), प्रशांत ब्रह्मदेव बंडगर (वय-३०), अविनाश दादासो फाळके, प्रथमेश पांडुरंग पतंगे आणि संदीप सुनील खोपडे यांचा समावेश आहे.
 
परीक्षेला विद्यार्थी मुकणार?
 
• महाराष्ट्र क-गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर आज (रविवार) होणार आहे. त्यामुळे, जखमी झालेल्या उमेदवारांपैकी काही जण या परिक्षेला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जखमी विद्यार्थ्यांना आजचा पेपर नंतर देण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी करत आहेत.
उपचाराचा खर्च सरकार करणार
 
• या अपघातातील सर्व जखमींचा खर्च हा सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. अपघातातील विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोनवर बोलणे झाले असून, त्यांनी विद्यर्थ्यांना दिलासा देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी दिली.

Related Articles